Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 52512 articles
Browse latest View live

संचबंदीने लोडशेडिंगचे संकट राहणार कायम

$
0
0

म.टा.प्रतिनिधी,चंद्रपूर

राज्याच्या विजेची २५ टक्के गरज पूर्ण करणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॉटचे दोन संच अद्यापही बंदच आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात लोडशेडिंगचे संकट कायम राहणार आहे. रविवारी वीज केंद्रातून केवळ ३१ टक्के निर्मिती सुरू होती. त्यामुळे वाढीव लोडशेडिंग करावे लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

वीज केंद्रात पहिले चार संच २१० मेगावॉटचे आहेत. उर्वरित तीन संच ५०० मेगावॉटचे आहेत. सात संचातून २ हजार ३४० मेगावॉट वीज निर्मिती केली जाते. येथील २१० मेगावॉटचे पहिले दोन संच बंद आहेत. ५०० मेगावॉटचे अनुक्रमे पाचवा व सहावा संच शनिवारी तांत्रिक बिघाडाने अचानक बंद पडला. त्यामुळे १ हजार २१० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी वीज निर्मितीत घट झाली. शनिवारी सायंकाळी तीन संचातून ६५० मेगावॉट वीज निर्मिती होत होती. ५०० मेगावॉटच्या पाचवा संचाला दुरुस्त करण्यासाठी सहा दिवस लागणार आहेत. ५०० मेगावॉटचा सहावा संच सोमवारी रात्री पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्त वीज संकट कायम राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमणात गोठले झेडपीचे उत्पन्न

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या जमिनींवर निर्णय होऊनही या जमिनी महसूल विभागातच अडकल्याने उत्पन्नाचे आर्थिक स्रोत आटतात की काय, अशी विचित्र परिस्थिती नागपूर जिल्हा परिषदेवर ओढवली आहे. या जमिनी नावावर करण्यासाठी ग्रामविकास विभागाने हिरवी झेंडी दाखविली असली, तरी महसूल विभाग मात्र सहकार्य करीत नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सत्तापक्ष कोंडीत सापडले आहे.

नागपूर शहरात सहा मोठ्या जागा, तर नागपूर ग्रामीणमध्ये १६ मोठ्या व मुख्य जागांवर जिल्हा परिषदेची मालकी आहे. अशा एकूण ५ हजार ३०२ जमिनी सध्या ग्रामविकास व महसूल विभागाच्या वादात सापडल्या आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. याशिवाय जिल्हा परिषदेच्याच हजारो एकर जमिनी शासनाच्या महसूल विभागात अडकल्या आहेत. मागील अनेक वर्षांपासून या जमिनी जिल्हा परिषदेच्या नावावर करण्यासाठी तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष व प्रशासन शासनाशीच संघर्ष करीत आहे. पाठपुरावा करूनही या जमिनी जिल्हा परिषदेच्या नावावर झालेल्या नाहीत. तत्कालीन काही अध्यक्षांनी जमिनी नावावर करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर शासनाच्या ग्रामविकास विभागाने अध्यादेश काढून त्या जमिनी जिल्हा परिषदेच्या नावावर करण्यास हिरवी झेंडी दाखविली. मात्र, असंख्य जमिनी महसूल विभागाच्या अंतर्गत येत असल्यामुळे महसूल विभाग ग्रामविकास विभागाला साथ देत नसल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीत समोर आले.

जिल्हा परिषदेच्या जमिनी ग्रामविकास व महसूल विभागाच्या वादात अडकल्या आहेत. या वादावर शासनातर्फे दोन्ही विभागांची एकत्र बैठक घेऊन महसूल विभागामार्फत नव्याने अध्यादेश काढून संबंधित जमिनी जिल्हा परिषदेच्या नावावर करण्यासाठी पुढाकार घेऊ.

-चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आढावा ‘व्हेंटिलेटवर’

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणारे शेतकरी आणि अन्य पशुधन जोपासणाऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर संशोधनात्मक पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी १५ वर्षांपूर्वी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची सुरुवात झाली. मात्र, दुर्दैवाने स्थापनेपासून विद्यापीठाला कारभारात सुसूत्रता आणणे आजवर कधीच जमले नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून संशोधनाचा आढावादेखील व्हेंटिलेटवर आहे. विद्यापीठात होणारे संशोधन पशुपालकांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.

विद्यापीठातील संशोधनाचा आढावा दरवर्षी घेतला जावा, असा दंडक आहे. एप्रिल ते मार्च या काळात विद्यापीठाच्या विविध विभागांत होणारे संशोधनकार्य एकत्रित करून त्यातील उपयोगी संशोधन पशुपालकांपर्यंत पोचावे, यासाठी राज्य सरकारने हा नियम घालून दिला आहे. राज्यातील परभणी, राहुरी, दापोली आणि अकोला या चारही कृषी विद्यापीठांत गेल्या ४३ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. यात आजवर खंड पडलेला नाही. या विद्यापीठातून झालेले संशोधन शेतकऱ्यांना अनेकदा फायदेशीर आणि नुकसानीतून वाचविणारे ठरले आहे. विशेष म्हणजे या चारही विद्यापीठातील संशोधनाचा नियमितपणे दरवर्षी आढावा घेतला जातो. त्यासाठी मे महिन्यामध्ये एकत्रिक बैठक घेऊन बहुपयोगी संशोधनाची दखलही घेतली जाते.

जो नियम कृषी विद्यापीठांना लागू आहे, तोच नियम पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठालाही लागू आहे. मात्र, माफ्सूला एकाही वर्षी ही परंपरा जपता आलेली नाही. यंदादेखील तोच प्रकार सुरू आहे. मार्च २०१४ ते एप्रिल २०१५पर्यंत झालेल्या संशोधन आणि विस्तार शिक्षणाचा आढावा घेणे अपेक्षित असताना विद्यापीठ प्रशासनाने गेल्यावर्षी म्हणजे मार्च २०१३ ते एप्रिल २०१४ या काळात केलेल्या संशोधनाचा आढावा सादर करण्याचे परिपत्रक जारी केले आहे. गेल्यावर्षी ज्यांनी संशोधन केले त्यापैकी ९५ टक्के संशोधने वर्तमान परिस्थितीला लागू होत नाहीत. शिवाय ज्यांनी संशोधन केले ते विद्यार्थी देखील शिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत. त्यामुळे या संशोधनाचा आढावा घेऊनही आता उपयोग नाही.

एका दिवसात गुंडाळला आढावा

उदगीर, परभणी, नागपूर, शिरवळ, अकोला, मुंबई येथील पशुवैद्यक महाविद्यालयात शिकणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाचा आढावा घेण्यासाठी प्रशासनाने बैठका बोलावल्या. त्यापैकी मुंबई वगळता बहुतांश ठिकाणच्या बैठका एका दिवसातच गुंडाळण्यात आल्या. शिरवळ आणि उदगीरमध्ये तर अद्याप त्याची बैठकही झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रत्यक्षदर्शींचे बयान अविश्वसनीय

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

मोनिका किरणापुरेची हत्त्या होत असताना आपण तेथे हजर होतो, असे सांगणारे तीन साक्षीदार सरकारी पक्षाने कोर्टासमक्ष सादर केले आहेत. परंतु या साक्षीदारांनी हत्या होताना बघितले होते तर त्याची माहिती पोलिसांना देण्यासाठी त्यांनी पाच ते सहा दिवसांचा अवधी का घेतला? पहिल्याच दिवशी ही माहिती पोलिसांना का नाही सांगितली. 'आपण घाबरलो होतो' हे कारण या तिन्ही साक्षीदारांनी दिलेले आहे. परंतु त्यासाठी इतका उशीर होणे शक्य नाही. त्यामुळे तिन्ही साक्षीदारांच्या बयानावर विश्वास ठेवणे शक्य नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे शनिवारी करण्यात आला.

मोनिका किरणापुरे प्रकरणी सरकारी पक्षाचा युक्तिवाद संपला असून आता बचावपक्षाचा युक्तिवाद सुरू आहे. अॅड. उज्ज्वल निकम हे सरकारी पक्षाची, तर अॅड. सुदीप जायस्वाल आणि अॅड. नितीन हिवसे हे बचाव पक्षाची बाजू मांडत आहेत. ११ मार्च २०११ रोजी मोनिका किरणापुरे हिची दिवसाढवळ्या हत्त्या करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टकलू हैवान

$
0
0

डोक्यावर टक्कल पडावे की पडू नये, हे काही आपल्या हाती नाही. तो निसर्गाचा किंवा नियतीचा नियम आहे. एकदा केस साथ सोडायला लागले की माणूस केसांचं अस्तित्व जपण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतो. पुढे पुढे तर अशी वेळ येते की हा प्रयत्न अतिशय केवीलवाणा असतो. म्हणजे डोक्याच्या फक्त मागे असलेले तुरळक केस लांब वाढवून त्यांना डोक्यावर पसरून टक्कल झाकण्याचा प्रयत्न केला जातो. खरे तर या प्रयत्नांमुळे त्याचे टक्कल अधिकच ठळकपणे लक्षात येते. पण तसे करणाऱ्याला आपल्या डोक्यावर (थोडेफार का होईना) केस असल्याचे समाधान असते. केसांनी अशी साथ देणे सोडल्यावर काहीजण मग रोज डोक्याची 'दाढी' करून टक्कल गुळगुळीत ठेवतात. त्यामुळे याने मुद्दामच टक्कल ठेवले, असे लोकांना वाटते, असे तसे करणाऱ्यालाही वाटत असते. खरं तर आपल्याकडे टक्कल पडणे हे विद्वत्तेचे लक्ष मानले जाते. खूप अभ्यासाने केस गेले असतील तर विद्वत्ता वगैरे ठीक, पण कोणताही फारसा अभ्यास न करता लग्न झाल्यावर केसांचा निरोप समारंभ सुरू होत असेल, तर त्याचा विद्वत्तेशी काय संबंध, असाही प्रश्न पडू शकतो.

टक्कल असण्याचे खरं तर फायदेही बरेच असतात. एक तर वाऱ्याने त्याचे केस विस्कटत नाहीत. पांढरे केस लपवायला मेंदी किंवा तत्सम रंगांचा आधार त्यांना घ्यावा लागत नाही, आणि विशेष म्हणजे कटिंगचा खर्च नाही. मागे एक जण कटिंग करायला गेला असता त्याच्याकडून सलूनवाल्याने जास्तीचे पैसे घेतले, असे त्याचे म्हणणे होते. कारण त्याच्या डोक्यावरचे केस शोधायला त्या कटिंग करणाऱ्याला बराच त्रास झाला म्हणे. हा गमतीचा भाग सोडला, तरी टक्कल पडणे कुणालाच आवडत नाही. अशा लोकांचे मनोबल कायम ठेण्यासाठी जपानमधील एका हॉटेलमध्ये टक्कल असणाऱ्या व्यक्तीस खाद्यपदार्थांवर विशेष सवलत दिली जाते. या हॉटेलची मालक एक स्त्री आहे आणि तिच्या डोक्यावरचे केस शाबुत आहेत. तरीही टक्कलवाल्यांच्या व्यथा तिला कळल्यावर तिने हा निर्णय घेतला आहे. एखादा टक्कल पडलेला व्यक्ती आपल्यासोबत आपल्या तशाच काही मित्रांना घेऊन आल्यास सवलतीचा आकडा या हॉटेलमध्ये वाढविण्यात येतो. टकलूंना सन्मान हे आमचे ध्येयं असल्याचे तिचे ब्रीद आहे.

त्यामुळे टकलू म्हणजे हैवान, टकलू म्हणजे रागीट, असे समजण्याचे कारण नाही. तसेच प्रत्येक टक्कल असलेला व्यक्ती विद्वान असतोच असेही मानण्याची गरज नाही. तोही इतरांसारखाच सर्वसामान्य असतो. त्यामुळे त्याचे टक्कल हा विनोदाचा विषय होऊ नये, असा संदेश या हॉटेलमधील सवलतीच्या निमित्ताने दिला जात आहे.

- सर्किट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूकंपामुळे बिमला नेगींचे एव्हरेस्ट अभियान रद्द

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

नेपाळमधील भीषण भूकंपानंतर गिर्यारोहक बिमला नेगी देऊस्कर यांना त्यांचे 'माऊंट एव्हरेस्ट एक्सपेडिशन नॉर्थ रिज्ड-२०१५' अभियान रद्द करावे लागले. भूकंपामुळे एवरेस्टच्या अनेक भागांमध्ये हिमस्खलन झाले. त्यामुळे पुढील मोहिमेला धोका निर्माण झाल्याने ही मोहीम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.

बिमला नेगी देऊस्करांनी चायनिज माऊंटेनेरिंग असोसिएशनच्या सहाय्याने ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. एव्हरेस्ट मोहिमेला सुरुवात केल्यानंतर बिमला नेगी आणि त्यांची चमू अनेक अडथळ्यांना पार करत एव्हरेस्टच्या २१ हजार फूट उंचावरील नॉर्थ कुलला पोचले. मात्र, याठिकाणी पोहचताच नॉर्थ कूल येथे पोहोचले असताना नेपाळ येथे झालेल्या भूकंपाचे धक्के त्यांना बसले, तेव्हा सुरक्षेच्या दृष्टीने बिमला नेगी व त्यांच्या चमूने आपले शिबिर उंचावर हलविले. मात्र, तरीही धोका टळला नव्हता.

दरम्यान, याच काळात चीनकडून सर्व गिर्यारोहकांना वर चढण्यास मनाई करून परत येण्याची सूचना करण्यात आली. नॉर्थ कूल भागालासुद्धा हिमस्खलनाचा फटका बसला. चीन सरकारने या सर्व गिर्यारोहकांना परत बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या गिर्यारोहकांना त्याच परवान्यावर पुढील तीन वर्षात कधीही पुन्हा एकदा एव्हरेस्टची मोहीम हाती घेता येईल, अशी हमी चीनकडून देण्यात आली आहे. बिमला नेगी-देऊस्कर आणि त्यांची चमू रविवारी लासाहून भारताकडे रवाना होणार असून सोमवारी सकाळी दिल्लीहून विमानाने नागपुरात दाखल होणार आहे. याकाळात बिमला नेगी आणि त्यांच्या चमूच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे अविनाश देउस्कर यांनी आभार मानले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पद्धती हव्या

$
0
0

नागपूरः शिक्षण मंत्र्यांच्या आवाहनानंतर काही प्राध्यापकांनी प्रश्ने उपस्थित केले. त्यात चॉइस बेस क्रेडिट सिस्टीमबाबत शंका उपस्थित करण्यात आली. तेव्हा तावडे म्हणाले, जगातील चांगल्या शैक्षणिक पद्धती येथे लागू करता झाल्या पाहिजेत. सीबीसीएसमध्ये ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अपेक्षित आहे. परंतु, येथे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपल्याकडील मास एज्युकेशनच्या पद्धतीत सीबीसीएस कसे लागू करता येईल त्यावर सविस्तर विचार करणे आवश्यक आहे. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाबाबत प्रश्ने विचारण्यात आली. तेव्हा येत्या वर्षभरात गोंडवाना विद्यापीठातील चार पदव्युत्तर विभाग आणि तेथील आदिवासी बहुल विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाकरिता शैक्षणिक उपक्रम लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सेट व नेट परीक्षांचा कोर्स व विद्यापीठांच्या कोर्समधील तफावतीमुळे येथील मुले मागे राहतात, असे डॉ. स्नेहा देशपांडे यांनी विचारले. तेव्हा नेट व सेट परीक्षार्थी होण्याऐवजी विषयाचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक असल्याचे तावडे म्हणाले. तर काही​ प्रमाणात सेट व नेटचे कोर्स विद्यापीठीय कोर्समध्ये समाविष्ट करण्याबाबत विचार करता येईल, असे त्यांनी नमूद केले. निलिमा देशमुख यांनी कुलगुरू निवड प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केला.

'मटा'चा उल्लेख

कुलगुरू निवड प्रक्रियेवर 'मटा'ने विषय मांडला होता. त्यात विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय बाजू सांभाळणारा सक्षम कुलगुरू कसा नेमता येईल त्याबाबत काही शिफारशी केल्या होत्या. त्याचा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी उल्लेख केला. तसेच ही माहिती इंग्रजीत अनुवादित करून राज्यपालांना सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणमंत्री म्हणाले, मी तर बाजीप्रभू!

$
0
0

म.टा,विशेष प्रतिनिधी, नागपूर

शालेय व विद्यापीठीय शिक्षकांच्या समस्यांनी हैराण झालेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी रविवारी प्राध्यापकांच्या मेळाव्यात स्वतःला बाजीप्रभू देशपांडे असल्याचे नमूद करीत दोन्ही सभागृहात एकटा खिंड लढवित असल्याची कोटी केली. त्यांच्या या विधानाने महाल येथील शिक्षक सभागृहात उपस्थितीत प्राध्यापक अवाक झाले. नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाच्यावतीने आयोजित प्राध्यापक मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला मंचचे पश्चिम विभागप्रमुख प्रा. प्रभूजी देशपांडे, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, गोंडवानाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, आमदार अनिल सोले, नागो गाणार, डॉ. मिलिंद माने व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंचच्यावतीने विनोद तावडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना तावडे म्हणाले, विधानसभा आणि विधानपरिषदेत सातत्याने शिक्षकांच्या वेतन, अनुदान, पदोन्नती यासारखेच विषय येत असतात. त्यामुळे कधीकधी मी शिक्षक मंत्री आहे की शिक्षण मंत्री असा संभ्रम उडतो. आधीच्या सरकारने शिक्षकांच्या समस्या सोडवल्या असत्या तर सरकारला ५५० कोटी रुपयांच्या मागण्या मंजूर करणे कठीण गेले नसते. परंतु, राज्यात दररोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळासारख्या समस्या बघता त्या मागण्या मंजूर करणे कठीण आहे. त्यास्थितीत सभागृहात बाजीप्रभू देशपांडे यांच्यासमान एकटा खिंड लढवित असतो, असा विनोदही त्यांनी केला.

दरम्यान, प्राध्यापकांनी दोन महिने विद्यापीठ परीक्षांवर बहिष्कार टाकला होता. त्या कालावधीतील वेतन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर उत्तर देताना तावडे यांनी प्राध्यापकांची भूमिका साफ चुकली असल्याचे खडसावले. विद्यार्थ्यांचा बळी देऊन मागण्या मान्य करून घेणे अयोग्य आहे. तिथे एकाच बॅचचा नव्हे तर विद्यार्थ्यांच्या करिअरचे नुकसान होते. तेव्हा भविष्यात अशी चूक होणार नाही​ त्याची खबरदारी प्राध्यापक संघटनांनी करावी. तसेच ज्या मागण्या सरकारसोबत चर्चा करून सोडवता येऊ शकतात, त्यावर कोर्टात जाण्याचे काहीही कारण नाही.

राज्यातील विना अनुदानित कॉलेजेसच्या विरोधात सरकार नाही, असे स्पष्ट करीत तावडे यांनी प्रवेश व शुल्क नियमन कायद्याचे समर्थन केले. जोवर विनोद तावडे शिक्षणमंत्री आहे, तोवर शिक्षण संस्थांकडून विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ देणार नाही, अशा शब्दात त्यांनी भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना सज्जड दम दिला. विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्याबाबत सरकार विचार करीत आहे. परंतु, विद्यापीठांतर्गत राजकारणांमुळे कुलगुरूंना काम करता येत नाही. परंतु, काही निर्णय हे शैक्षणिक प्रक्रियेतूनच घेणे आवश्यक आहे. त्यामुळे राजकारणविरहित प्राधिकारणींना प्रशासनावर नियंत्रण ठेवता यावे, अशी तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तथागत बुद्धांचे नागपुरात होते महिनाभर वास्तव्य

$
0
0

अविनाश महालक्ष्मे, नागपूर

तथागत गौतम बुद्ध आपल्या भ्रमंतीच्या काळात जवळपास महिनाभर नागपुरात वास्तव्यास होते. सिद्धार्थचा 'गौतम बुद्ध' झाल्यानंतर बुद्धांनी जवळपास विविध ८४ हजार स्थळांना भेट देऊन तेथे धम्मदेसना दिली होती. यात नागपूर आणि विदर्भातील काही गावांचाही समावेश होता. त्यांच्याच सांगण्यावरून अंबतिथ्यक नावाच्या व्यक्तीने अंबाझरी तलावाची निर्मिती केली होती. अंबतिथ्यकवरूनच अंबाझरी हे नाव पडले, असा दावा गेल्या पंधरा वर्षांपासून बुद्धकालीन स्थळांचा संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्या सत्यशोधन समितीने केला आहे. त्रिपिटक, दीपवंश, महावंश, बुद्धवंश व प्राचीन भूगोल या ग्रंथांचा आधार घेऊन समितीने हा दावा केला आहे.

श्रीलंकेवरून परतताना तथागत लोकपूर (चंद्रपूर), भदवती (भद्रावती)मार्गे फणींद्रपूर, अंबाडा, नगरधन, पवनी, नागभीड या मार्गाने जाणार होते. नागपूरचे नाव फणींद्रपूर असल्याचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्येही आढळतो. तथागत भद्रावती येथे असताना भन्ते सागत यांनी बुद्धांना सांगितले की, आपण फणींद्रपूरमार्गे जाऊ नये. कारण त्या क्षेत्रात अंबतिथ्यक नावाचा क्रूर व प्रभावी व्यक्ती राहतो. त्याची त्या भागात प्रचंड दहशत आहे. त्यामुळे तुमच्या जीवाला धोका संभवतो. मात्र तथागत आपला मार्ग बदलण्यास तयार नव्हते. त्यामुळे तथागत प्रवासाला निघण्यापूर्वीच भन्ते सागत यांनी नागपूर गाठले आणि अंबतिथ्यकची भेट घेऊन बुद्ध तत्त्वज्ञानाने त्याचे मतपरिवर्तन केले.

अंबतिथ्यकाला भगवान बुद्धांना भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. ज्याच्या शिष्याच्या विचारांनी आपले मनपरिवर्तन झाले. त्या बुद्धाचे व्यक्तिमत्त्व किती प्रभावी, असेल असा प्रश्न अंबतिथ्यकाला पडला. त्यामुळे प्रत्यक्षात तथागत नागपूरला आले त्यावेळी अंबतिथ्यकाने त्यांचे जंगी स्वागत केले. जवळपास महिनाभराच्या वास्तव्यात बुद्धांनी येथे धम्मेदसना दिली. येथील नागलोक व अंबतिथ्यकाने या भागातील अनेक प्रश्नांवर बुद्धांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी राजा, प्रजा यांच्या सहकार्याने व एकोप्याने दुष्काळावर मात करण्यासाठी एखादा जलसाठा निर्माण करावा अशी सूचना केली.

शहराच्या पश्चिमेस उंच पठारावरून दोन झरे वाहात होते. अंबतिथ्यकाने या झऱ्यांना बांध घातला. तलावाची निर्मिती झाली. या काळात बुद्ध नागपुरातच वास्तव्याला होते. अंबतिथ्यक नावावरूनच या तलावाला अंबाझरी नाव पडले. हा तलाव बुद्धकालीन असल्याचे समितीचे संयोजक धर्मेश नागमित्र यांचे म्हणणे आहे. यासंबंधात समितीने पुरातत्त्व विभागालाही कळविले आहे. नागमित्र यांच्यासह जीवन दुपारे, निशिकांत वांद्रे, सुरेश अलोणे, सुरेश जिंदे, प्रकाश मेश्राम, दिलीप मेश्राम, सचिन लोखंडे, गुणानंद वंजारी, देवीदास टेंभुर्णे, अमित झोडापे, संजय वाकडे, अशोक ब्राम्हणे, राजरतन भगत, राजू थूल, क्षितिज पाटील हे समितीचे सदस्य विविध स्थळांवर जाऊन अभ्यास करीत आहेत.

अंबाझरी तलावाच्या बंधाऱ्यावर स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा महापालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. त्याला आमचा विरोध नाही उलट समर्थन आहे. कारण विवेकानंदांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान मांडले. मात्र या तत्त्वांचा फारसा प्रचार केला जात नाही. त्यामुळे विवेकानंदांचा पुतळा उभारला जावाच, सोबतच बुद्धांच्या उपस्थितीत हा तलाव झाला असल्याने मध्यभागी हैद्राबादच्या हुसेन सागरच्या धर्तीवर भगवान बुद्धाचा पुतळा उभारावा.

- धर्मेश नागमित्र, संयोजक, सत्यशोधन समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माफियांमुळे अडकला लिलाव

$
0
0

उज्ज्वल भोयर, नागपूर

अगदी टोळीयुद्धापर्यंत मजल गेलेले सावनेरातील रेती माफिया निरंकुश आहेत. माफिया आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे तालुक्यातील ४६ पैकी केवळ दहाच रेती घाटांचा लिलाव आतापर्यंत झाला आहे. या माफियांवर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा आहे. रेतीच्या वादामुळे आतापर्यंत खापरखेडा, सावनेर परिसरात अनेकदा रक्तरंजित संघर्षही झाला आहे.

तालुक्यातील ४६ रेतीघाटांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने शासनाकडे पाठविला होता. परंतु त्यापैकी केवळ दहाच रेतीघाटांचा लिलाव झाला आहे. लिलाव प्रक्रिया ई-टेंडरिंगने घेण्यात आली. परंतु याच घाटाच्या बाजूला असलेल्या घाटांच्या लिलावात कोणीही सहभागी झालेले नाही. लिलाव न झालेल्या घाटांवरून मोठ्या प्रमाणात रेती चोरी करण्यात येते. यावर कुणाचाही अंकुश नाही. परिणामी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.

अधिकाऱ्यांवर हल्ले

राजकीय आश्रय असल्याने रेती माफिया अधिकाऱ्यांवर हल्लेही करतात. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक गौरव सिंह, कन्हान क्षेत्रात दोन गटातील गोळीबार, सावनेरच्या महसूल अधिकाऱ्यावर प्राणघात हल्ला अशा घटना सावनेरात अनेकदा घडल्या आहेत.

माफियांजवळ शस्त्र

रेती माफियांपैकी अनेकांकडे बंदुकी आहेत. त्याचा वापर नेहमीच सावनेर तालुक्यात होतो. रेती घेऊन निघणारी वाहने भरधाव जातात. त्यांना कुणीही आडकाठी करण्याचा प्रयत्न केल्यास प्रसंगी चिरडून टाकण्याचे धाडसही चालक करतात. रेती वाहून नेणाऱ्या ट्रकच्या अनियंत्रित वेगामुळे अपघाताचा धोकाही आहे. तशा घटनाही घडल्या आहेत.

'लतिफ'ची दहशत

सावनेर तालुक्यात रेती माफियांचा किंग म्हणून लतिफची ओळख आहे. त्याच्या विरोधात खून, लुटमारसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो नागपूर जिल्ह्यातून तडीपार आहे. लतीफ एका राजकीय नेत्याच्या अत्यंत जवळचा कार्यकर्ता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे आर्थिक रसद पोहचवण्याचे काम होते.

नियम धाब्यावर

रेती उपसण्यासाठी पोकलॅन्ड यंत्राचा वापर.

पाच फूट पर्यंतच रेती काढण्याची परवानगी.

नियम मोडून पाच फुटानंतरही काढली जाते रेती.

एकाच रॉयल्टीच्या पटीवर दिवसभरात अनेकदा वाहतूक करण्यात येते.

तीन ऐवजी पाच ब्रास रेतीची ट्रकातून वाहतूक

लिलाव झालेले घाट

बावनगाव अ, ब

कोच्छी अ, ब

खैरी

दलगाव

बडेगाव

लिलाव न झालेले घाट

एकूण घाट ३६

गोसेवाडी घाट लिलावावर कोटातून स्थगिती.

कन्हान नदीवरील अनेक घाटांचा लिलाव नाही.

पारशिवनी तालुक्यातील पारडी, सावलीचाही लिलाव नाही.

सावनेरातील घाटांचे लिलावही रखडलेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्द्रतेमुळे पुन्हा अवकाळी?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

ऊन खूप तापल्याने मध्य भारतातील आर्द्रता वाढत आहे. त्यातून कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पुन्हा एकदा विदर्भाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मे महिना लागताच नागपूरसह विदर्भातील पाऱ्यात वाढ होत आहे. नागपूर, चंद्रपूर आणि वर्धेतील पारा सातत्याने सरासरीपेक्षा दोन ते तीन अंश अधिक आहे. चंद्रपूरचे तापमान दररोज राज्यात सर्वाधिक ठरत आहे. तसे असताना आर्द्रता वाढल्याने अवकाळी पावसाचा धोका वाढला आहे. येथील प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, संपूर्ण मध्य भारतात सध्या उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती आहे. ऊन तापल्याने आर्द्रता वाढली आहे. यामुळे उत्तर छत्तीसगडवर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. सोमवार सायंकाळपर्यंत हा पट्टा पूर्ण रुपात तयार होऊन पुढील ४८ ते ७२ तासांत विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. २५ टक्के भागात हा पाऊस पडेल. तर नागपूर शहरात दिवसा ऊन तापून सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तापते ऊन आणि दुसरीकडे आर्द्रतेमुळे वाढलेला उकाडा, अशा दुहेरी कचाट्यात सामान्यांचे हाल होताहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता विमानतळावर ‌मिळणार मद्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

मिहानच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मागून घेतलेले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ तोट्यात आहे. तोट्यातील विमानतळावरील महसूल वाढविण्यासाठी मिहान इंडिया ‌लिमिटेड हे प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याअंतर्गत आता विमानतळावर चक्क मद्यविक्रीसाठी निविदा काढण्यात आली आहे.

मिहानसाठी राज्य सरकारच्या एमएडीसीने ऑगस्ट २००९मध्ये नागपूरचे विमानतळ केंद्र सरकारच्या एएआयकडून हस्तांतरित करून घेतले. यानंतर एमएडीसीच्या ५१ टक्के भागिदारासह राज्य आणि केंद्र सरकारने मिहान इंडिया ‌‌लिमिटेड ही संयुक्त कंपनी स्थापन केली. या कंपनीद्वारेच विमानतळाचे परिचालन होत आहे. पण, २००९पासून आतापर्यंत केवळ एका वर्षी झालेला सहा लाख रुपयांचा अत्यल्प नफा वगळता उर्वरित सर्वच वर्षी विमानतळ तोट्यात आहे. आता हे विमानतळ मिहानसाठी खासगी कंपनीकडे हस्तांतरित करायचे आहे. त्यासाठीची जागतिक निविदा काढण्याची तयारी सुरू आहे. पण, निविदा काढून कंपन्या विमानळाकडे आकर्षित होईपर्यंत त्याचा महसूल वाढावा, असा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. विमानतळावरील प्रत्येक जागेचा उपयोग महसूल वाढीसाठी व्हावा, असा मिहान इंडिया लिमिटेडचा प्रयत्न आहे. यासाठीच विमानतळ परिसरात एटीएम केंद्राला जागा देणे आणि विमानतळाच्या सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून स्वत:ची जाहिरात करण्यासाठी कंपन्यांना मागील वर्षी आकर्षित करण्यात आले. यानंतर आता ‌मिहान इंडियाने टर्मिनल इमारतीतील १०७ चौरस फुट (१० चौरस मीटर) जागेचा सदुपयोग करण्यासाठी निविदा काढली आहे.

ही जागा दारूच्या दुकानासाठी लिजवर देऊन त्याद्वारे महसूल मिळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, येथून केवळ दारूची विक्री होईल. तेथे दारूप्राशन करण्याची परवानगी नाही, असे निविदा दस्तावेजांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. २६ मेपर्यंत यासाठी मिहान इंडियाने अर्ज मागविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत बांधकामे नियमित होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,नागपूर

शहरात अनधिकृत आणि नियमबाह्य केलेल्या बांधकामास ​शुल्क आकारून नियमित करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. राज्य सरकारने यासंबंधीचे संकेत दिल्यानंतर उपराजधानीतही त्यासंबंधीची पावले उचलण्यात आली आहेत. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत अनधिकृत बांधकामे आणि मंजूर रेखाचित्रापेक्षा अधिकची बांधकामे झालेल्यांकडून दंडात्मक शुल्क आकारून त्यांना नियमित करण्यात येणार आहेत. सोबतच यासंबंधीचे एक धोरणही निश्चित करण्यात येणार आहे. नगर रचना विभागाकडून यासंबंधीचा प्रस्ताव मांडण्यात येणार असून प्रशासनाने काही मार्गदर्शक तत्वे व सुधारित दरही प्रस्तावित केले आहेत.

नियमित करण्यात येणाऱ्या बांधकामात दहा मीटर उंचीपर्यंतच्या निवासी इमारतींकरिता रेडी रेकनुसार ​एकूण बांधकाम क्षेत्राच्या ५० टक्के प्रती चौरस मीटर प्रमोशनल तसेच वाणिज्य वापर बांधकामासाठी प्रती चौरस मीटर ७५ टक्के शुल्क आकारले जातील. दहा मीटरच्यावर आणि १४.९९ मीटरपर्यत उंची असलेल्या निवासी व वाणिज्य इमारतीसाठी रेडी रेकनरच्या ५० व ७५ टक्के शुल्क आकारले जातील. १५ मीटर आणि त्यावरील निवासी व वाणिज्य इमारती आणि सार्वजनिक/ निम सार्वजनिक शैक्षणिक संस्थांच्या इमारतीसाठी अग्निशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र असल्यास एकूण बांधकाम क्षेत्राच्या रेडी रेकनरमधील बांधकाम दराचे ५० टक्के व ७५ टक्के प्रती चौरस मीटर याप्रमाणे शुल्क आकारले जातील.

सर्व इमारतीचे सामान्य नियमितीकरण करण्याच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. औद्योगिक इमारतीचे नियमितीकरण करण्यासाठी निवासी इमारतीकरिता निवासी व वाणिज्य बांधकाम शुल्काच्या १५० पट शुल्क आकारून औद्योगिक इमारतीचे बांधकाम नियमित करता येईल. तसेच संस्थांच्या वापराच्या इमारतीचे बांधकाम नियमितीकरण, निवासी इमारतीकरिता शुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे.

याशिवाय सार्वजनिक आरोग्य, सुरक्षा प्रभावित होत आहे, असे दिसून आल्यास अशाप्रकरणी आयुक्तांना ​अधिकार राहील. या शुल्कांतर्गत विकास नियंत्रण नियमानुसार आवश्यक असलेल्या वाहनतळाच्या जागेत शिथिलता देण्यात येणार नाही. सोबतच वापराची जागा, उल्लंघन केलेल्या भूखंडाचे क्षेत्र माळयानिहाय वसूल करण्याचे प्रस्तावित आहेत. विकास योजनेतील आरक्षणांचे उल्लंघन केल्यास त्याला सूट देण्यात येणार नाही. चटई क्षेत्र निर्देशांक मर्यादेच्या उल्लंघन प्रकरणात, विकास नियंत्रण नियमावलीत नमूद चटई क्षेत्र निर्देशांकाकरिता मुक्त असलेल्या अस्तित्वातील अधिकतम ३० टक्के मर्यादेत राहूनच बांधकाम मंजुरी प्रदान करण्यात येईल. ज्या बिल्डरचे पूर्वीचे बांधकाम पूर्णत्वाच्या दाखला घेण्यात आला नसेल तर त्याचे शहरातील इतर ठिकाणी बांधकाम चालू असल्यास त्या सर्व बांधकामास नगररचना सहसंचालक यांच्या मान्यतेते स्थगिती देण्यात येईल. त्यानुसार स्थगिती देण्यात आलेल्या मिळकतीबाबत संबंधित मालक व हितसंबंधितांना विकासकाच्या कृत्याबाबत कळविण्यात येईल, असेही प्रस्तावात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकी ही रोजगार हमी

$
0
0

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर

प्राध्यापकी म्हणजे चांगली रोजगार हमी असल्याची प्रखर टीका करीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ व कॉलेजमधील प्राध्यापकांचा गोंडवाना व नागपूर विद्यापीठांच्या कुलगुरूंसमक्ष पाऊण तास 'क्लास' घेतला. प्राध्यापकांनी वेतन, अनुदान आणि पदोन्नतीच्या तक्रारींच्या पलिकडे जाऊन शैक्षणिक परिवर्तन करण्यासाठी सूचना कराव्यात, असे खडसावत तावडे यांनी प्राध्यापकांना निरूत्तर केले.

नागपूर विद्यापीठ शिक्षण मंचाच्या वतीने नागपूर, अमरावती व गोंडवाना विद्यापीठ क्षेत्रातील प्राध्यापकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात उपस्थित प्राध्यापकांशी थेट संवाद साधताना विनोद तावडे यांनी प्राध्यापकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिफारशी अथवा काही सूचना असल्यास मांडाव्यात, असे आवाहन केले. परंतु, प्राध्यापकांकडून वारंवार वेतनश्रेणी आणि सेवाशर्तीबाबतच सूचना आल्यात. तेव्हा संतप्त झालेल्या तावडे यांनी प्राध्यापकांना कडक शब्दात सुनावले. राज्यातील एकही विद्यापीठ जगातील ५०० विद्यापीठांमध्ये नाही, त्याची खंत वाटत नाही काय? विद्यापीठ क्षेत्रात संशोधनाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. तेव्हा प्राध्यापक त्यांच्या वैयक्तीक समस्या बाजूला ठेवून शैक्षणिक बाबींवर काहीच मंथन करीत नाहीत काय, असा खडा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, संघटनेच्या वतीने तुमचे निवेदन स्विकारले आहे. त्यावर मंत्रालयात दोन तासाची विशेष बैठकही घेण्यास तयार आहे. तेव्हा समस्यांवर बैठकीत चर्चा होईल. त्यावर तोडगाही निघेल. परंतु, आज शैक्षणिक गुणवत्ता विकासावर चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिदुर्गम गावांतील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार सातबारा

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, चंद्रपूर/नागपूर

अतिदुर्गम गावातील शेतीचे मोजमाप करून लवकरच शेतकऱ्यांना सातबारा वाटप केले जाईल, अशी घोषणा राज्याचे गृह (ग्रामीण), सार्वजनिक आरोग्य, कृषी व फलोत्पादन, पणन व पर्यटन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली. महाराष्ट्र-तेलंगण राज्याच्या सीमेवर असलेल्या साडेबारा गावांपैकी महागुडा व परमडोली या गावांना त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. दोन्ही गावातील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला.

राजुराचे आमदार अॅड.संजय धोटे, नागपूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलिस अधीक्षक राजीव जैन, उपविभागीय अधिकारी शंतनू गोयल, पोलिस उपअधीक्षक विजय चव्हाण, जिवतीच्या सभापती अश्विनी गुरमे, उपसभापती सुग्रीव गोतावडे, परमोडलीचे सरपंच देवाजी आडे आदी यावेळी उपस्थित होते.

गावांसाठी पाठपुरावा ः नागपुरात बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, तेलंगणा सीमेवर असलेलेली चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील त्या गावांवर महाराष्ट्राचाच हक्क असल्याचा दावा करीत याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. परमटोला व महाराजगुडासह सात महसुली गावांसह १४ गावे तेलंगण सीमेवर आहेत. दोन्ही राज्ये या गावांवर आपापला दावा करीत आहेत. हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेले. न्यायालयाने महाराष्ट्राच्या बाजूने निर्णय दिला. वेळ पडल्यास केंद्रात दाद मागण्यात येईल, असेही प्रा. शिंदे म्हणाले. हा मुद्दा 'मटा' लाऊन धरला होता.

आणखी हेलिकॉप्टर

माओवादी कारवाया समूळ नष्ट करण्यासाठी गडचिरोलीला लवकरच दुसरे हेलिकॉप्टर देण्यासंदर्भात प्रयत्न करू असे प्रा. शिंदे यांनी नमूद केले. पोलिसांना तणावमुक्त वातावरणात कामाची संधी मिळावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्राम पंचायत निवडणूक शांततेत पार पाडल्याबद्दल त्यांनी पोलिसांची पाठ थोपटली. भविष्यात पोलिसांना सहकार्य मिळेल असे ते म्हणाले.

पदोन्नती देणे नाईलाज

जेलब्रेक प्रकरणाची पोलिस महासंचालकामार्फत चौकशी सुरू आहे. याप्रकरणात ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. कारागृहात निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यात येत असल्याबाबत विचारणा केली असता शिंदे म्हणाले, कारागृहात कर्मचारी व अधिकाऱ्यांची कमतरता आहे. नाईलाजाने त्यांना पदोन्नती द्यावी लागते, असे ते म्हणाले. २०१४ मधील पोलिस भरतीतील सुमारे १५० युवक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत, त्याबाबत लवकरच निर्णय होईल. ्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. मुंबईला गेल्यावर यावर निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘त्या’ क्रूर बापाचा पोलिसांकडून शोध

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, बुलडाणा/नागपूर

जन्माला येऊन जेमतेम एक वर्षही न झालेल्या बाळाला तापत्या तव्यावर उभे करणाऱ्या क्रूर बापाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. औरंगाबाद येथील वाळूज परिसरात ही घटना घडली होती. बुलडाणा येथे माहेरी आल्यानंतर पीडित बालकाच्या आईने पतीविरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

बुलडाणा येथील रुपाली विष्णू खरात यांचा विवाह जालना जिल्ह्यातील सुनील हिंमत भोसले याच्याशी सुमारे तीन वर्षांपूर्वी झाला होता. औरंगाबादेतील वाळूज येथे राहणाऱ्या सुनीलला दारूचे व्यसन होते. त्याचा तिला प्रचंड त्रास होता. दरम्यान २८ एप्रिल रोजी रूपालीने आपला एक वर्षाचा मुलगा शिवराज याला सुनीलकडे सोपवले व ती शौचास गेली. दारूच्या नशेत सुनीलने चिमुकल्या शिवराजला जवळच असलेल्या तापत्या तव्यावर उभे केले. प्रचंड तापलेल्या तव्याचे चटके असह्य झाल्याने शिवराज विव्हळून रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून रूपाली धावत तेथे आली. शिवराजला सुनीलच्या तावडीतून सोडवून रूपालीने तातडीने बुलडाणा येथे आपले माहेर गाठले. माहेरच्या मंडळींना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर रूपालीने नातेवाइकांच्या मदतीने बुलडाणा पोलिस ठाण्यात सुनील विरुद्ध तक्रार दाखल केली. बुलडाणा पोलिसांनी गुन्हा नोंदवून प्रकरण वाळूज पोलिसांना पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिवड्याचे आमिष, ६१ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

चिवड्याचा कारखाना लावायचे आमिष दाखवून शहरातील दोघांना तब्बल ६१ लाख रुपयांनी लुबाडल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुलेमान मैदीन बावा (५०) आणि शाकिप अहमद शब्बीर अहमद, अशी या दोन्ही फिर्यादींची नावे आहेत. मुश्ताक अहमद वल्द अब्दुल हकीम, असे आरोपीचे नाव आहे. आरोपी मूळ चैन्नई येतील रहिवासी असून सध्या फरार आहे. सुलेमान यांना त्यांनी चिवड्याचा कारखाना सुरू करून त्यात पार्टनर बनविण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांनी तर शाकिप यांनासुद्धा हेच आमीष दाखवित ३६ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप या दोघांनी केला आहे. सुलेमान यांनी गेल्या आठवड्यात पोलिसांकडे तक्रार केली तर शाकिप यांनी रविवारी ही तक्रार दाखल केली. गिट्टीखदान पोलिसांनी मुश्ताकवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

बॅग पळविली

कमाल चौक परिसरात दीड लाख रुपयांची बॅग पळविल्याची घटना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजतादरम्यान घडली. मनिषा प्रशांत बरडे (३६),रा. कोराडी चौक असे या फिर्यादी महिलेचे नाव आहे. बरडे या कमाल चौकात उभ्या होत्या. यावेळी त्यांच्या गाडीच्या हँडलला दागिने आणि रोख रक्कम असा दीड लाख रुपयांचा मुद्देमालाचा समावेश असलेली बॅग होती. त्यांच्या बाजुला उभ्या असलेल्या तीन अनोळखी महिलांनी अचानक आरडाओरड केली आणि बरडे यांचे लक्ष विचलित केले. या दरम्यान त्यातील एका महिलेने त्यांची बॅग लंपास केली. पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राधेश्याम बिनकर सभागृहातील लग्न समारंभात एका महिलेचे ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र प‍ळविण्यात आले. रेखा प्रेमदास गेडाम (६८) असे या फिर्यादीचे नाव आहे.

तरुणाची आत्महत्या

इतवारी पोस्ट ऑफिसजवळ राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने राहत्या विष प्राशन करून आत्महत्या केली. विकास पुरुषोत्तम पौनिकर, असे या मृतकाचे नाव आहे. त्याने २८ एप्रिल रोजी विष प्राशन केले. रविवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच आदिवासीनगर, पोलिस लाइन टाकळी परिसरातील एका २० ‍वर्षीय तरुणीने तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. दिपा जगदीशप्रसाद शाहू, असे या तरुणीचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऊर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातच ‘अंधार’

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

राज्यभरात दुष्काळी वातावरणामुळे विजेचा प्रचंड तुटवडा आहे. ग्रामीण भागात आजही भारनियमन सुरू असताना दस्तुरखुद्द पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात मात्र याचे कोणालाच सोयरसूतक नाही. राज्यात आणि जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता असतानाही सरकारी कार्यालयांमध्ये बेजबाबदारपणे व‌िजेचा अपव्यय सुरू असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारित अनेक विभागांमध्ये कर्मचारी नसतानाही सर्रासपणे दिवे आणि पंखे सुरू असतात. पंख्याची हवा खायला देखील कर्मचारी जागेवर नसतो. तास न् तास हे कर्मचारी खुर्चीपासून दूर कुठे तरी गायब राहतात. मात्र, कार्यालयाबाहेर जाताना निदान पंखा, दिवा बंद करावा, याचेदेखील गांभीर्य या कर्मचाऱ्यांना उरत नाही. विजेच्या बिलाची झळ त्यांच्या खिशाला बसतच नसल्याने या कर्मचाऱ्यांची वागणूकही अत्यंत बेजबाबदार असल्याचे या प्रकारावरून दिसून येते. विशेष म्हणजे यात अधिकारी देखील मागे नाहीत. त्यामुळे याचा भूर्दंड मात्र जिल्हा परिषदेला, पर्याशाने शासनाला सोसावा लागत आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आहे. विशेष म्हणजे ते याच जिल्हा परिषदेचे दीर्घकाळ सदस्यही होते. दुसरीकडे राज्यात जशी भाजपाची सत्ता आहे, तसेच जिल्हा परिषदेवरही भाजपाचीच सत्ता आहे. अशा परिस्थितीत ऊर्जामंत्री राज्यभर वीज बचतीचा संदेश देत फिरत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच जिल्ह्यात मात्र विजेचा असा सर्रास अपव्यय करण्यात येत असल्याने 'दिव्याखाली अंधार' या प्रचलित म्हणीचा प्रत्यय सध्या जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांना येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताडोब्यात आढळला दुर्मिळ ब्लॅक बाझा

$
0
0

नागपूर : अधिवासांच्या संपन्नतेमुळे विदर्भात पक्षांच्या प्रजातींचे मोठे वैविध्य आढळते. सुमारे ४५० प्रजातींचे वैभव मिरवणाऱ्या विदर्भात आणखी एका दुर्मिळ पक्ष्याची नोंद झाली आहे. ब्लॅक बाझा या नावाने ओळखल्या जाणारा हा पहिल्यांदाचा ताडोब्याच्या जंगलात आढळून आला आहे. गवताळ माळराने, झुडपी जंगले, पाणवठ्यांच्या जागा अशा अधिवासांमध्ये पक्षांचे अस्तित्व आढळून येते. विपुल संरक्षित जंगल प्रदेशांमुळे विदर्भात हे अधिवास आजही टिकून आहेत. अधिवासांना लाभलेल्या या संरक्षणामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणात पक्षी वैभवाची नोंद आहे. या नोंदीत भर घालणारा 'ब्लॅक बाझा' हा दुर्मिळ पक्षी संशोधकांना ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आढळून आला आहे. अत्यंत सुंदर दिसणारा हा शिकारी पक्षी तुर्रेबाज किंवा कलाबाज या मराठी नावांनीदेखील ओळखला जातो. अमरावतीच्या वाइल्ड लाइफ अॅण्ड कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य असलेले व पुण्यात वास्तव्यास असणारे गजानन बापट यांना हा पक्षी ताडोब्यात आढळून आला आहे. विविध संदर्भ आणि उपलब्ध माहिती यांचा अभ्यास केल्यानंतर हा पक्षी विदर्भात पहिल्यांदाच आढळला असल्याचे तथ्य समोर आले आहे. बापट यांनी या नोंदीची माहिती संबंधित संस्थांना तसेच इ-बर्ड संकेतस्थळाला व विविध शास्त्रीय जर्नल्सला पाठविली आहे. हा पक्षी परतीच्या स्थलांतरादरम्यान ताडोब्यात आला असावा व छत्तीसगड किंवा गडचिरोलीच्या जंगलातून प्रवास करीत येथे पोचला असावा.

विदर्भातील पहिली नोंद

तुर्रेबाज किंवा काळा बाझ असलेल्या या पक्ष्याचे शास्त्रीय नाव आव्हिसिडा ल्युफोतीस असे आहे. या पक्ष्याची लांबी ३० ते ३५ सेंटीमीटर तर त्याचे वजन १६८ ते २२४ ग्रॅम इतके आहे. पूर्वोत्तर राज्यातील सदाहरित जंगलांमध्ये तसेच आशियातील काही देशात हा पक्षी आढळतो. भारतात आल्यावर पश्चिम घाटातील गोवा व केरळच्या प्रदेशात स्थलांतर करतो. महाराष्ट्रासाठी हा अत्यंत दुर्मिळ असून यापूर्वी १९८६मध्ये भीमाशंकरच्या जंगलात सापडल्याची नोंद आहे. विदर्भातील ही पहिली नोंद असल्याचे महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचे सहकार्यवाह डॉ.जयंत वडतकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधीक्षक अभियंत्यासह ३ अधिकारी निलंबित

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, यवतमाळ

शेतकऱ्याला कृषिपंपासाठी वीज जोडणी मिळावी म्हणून सहकार्य न करणाऱ्या व त्याला खोट्या प्रकरणात अडकवणाऱ्या महावितरणच्या तीन अधिकाऱ्यांना सोमवारी निलंबित करण्यात आले आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या त्रासामुळे संबंधित शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. बाभूळगाव तालुक्यात चिमणाबागापूर येथील ही घटना असून अमरलाल मणिहार हे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

या प्रकरणी महावितरणचे यवतमाळ येथील अधीक्षक अभियंता अशोक फुलकर, बाभुळगावचे उपकार्यकारी अभियंता सुरेश झाडे, बाभुळगाव शहर वितरण केंद्राचे सहायक अभियंता संजय कांबळे यांना अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता संजय ताकसांडे यांनी तडकाफडकी निलंबित केले. दोनच दिवसांपूर्वी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळ येथे बैठक घेतली होती. त्यात शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाईचे आदेश दिले होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांना ऊर्जा खातेही काही प्रमाणात जबाबदार असल्याची खंत बावनकुळे यांनी या बैठकीत व्यक्त केली होती. वीज अधिकाऱ्यांमुळे एका ८० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा मुद्दाही चर्चेला आला होता.

मणिहार सुमारे ४० वर्षांपासून नियमितपणे महावितरणचे वीजबिल भरत होते, असा ग्रामस्थांचा दावा आहे. दरम्यान म‌णिहार यांचे सुपुत्र अश्विन कुमार यांनी सोमवारी यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रकाराची विस्तृत माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 52512 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>